गरिबीला संधी बनवा; शिक्षणाच्या बळावर यशाची शिखरे पादाक्रांत करा!— आप्पासाहेब हंडाळ, पोलीस उपनिरीक्षक, श्रीरामपूर

सात्रळ येथील रयत शैक्षणिक संकुलात गुरुकुल प्रकल्पांतर्गत बाह्य तज्ज्ञ मार्गदर्शन
सोनगाव : प्रतिकूल परिस्थिती ही यशाच्या मार्गातील भिंत नसते, तर जिद्द आणि संघर्षाच्या बळावर तीच यशाची पहिली पायरी ठरते. गरिबीवर मात करून स्वावलंबी जीवन घडवायचे असेल, तर शिक्षणाला पर्याय नाही. शिक्षणातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविताना कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीतही मोलाचे योगदान देता येते, असा प्रेरणादायी विचार श्रीरामपूरचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
सात्रळ (ता. राहुरी) येथील रयत शैक्षणिक संकुलात गुरुकुल प्रकल्पांतर्गत बाह्य तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हंडाळ यांनी स्वतःच्या जीवनप्रवासातील संघर्षाचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांना परिस्थितीसमोर खचून न जाता ध्येयासाठी झोकून देण्याचे आवाहन केले.
“स्वावलंबनाने व संघर्षातून शिक्षण घेऊन मिळालेले यश वैभवशाली असते,” या विचारावर भर देताना त्यांनी शिक्षणाचे व्यापक महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण म्हणजे केवळ पदवी किंवा नोकरीचे साधन नसून, व्यक्तीच्या विचारांना दिशा देणारी आणि समाजाच्या प्रगतीला गती देणारी शक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गरिबीमुळे संधी कमी होऊ शकतात; मात्र जिद्द, सातत्य आणि शिक्षणाची ताकद असेल तर परिस्थिती बदलण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करत हंडाळ यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य नियोजन, अभ्यासाचे सातत्य, वेळेचे व्यवस्थापन आणि नियमित सराव यांचे महत्त्व समजावून सांगितले. जीवनात निश्चित ध्येय असणे आणि त्या ध्येयाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करणे हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःची प्रगती हीच समाजाच्या प्रगतीची सुरुवात असून, सक्षम विद्यार्थी घडले तर सक्षम समाज आणि सक्षम राष्ट्र घडते, असा व्यापक संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, कर्मवीर भाऊराव पाटील आणि थोर स्वातंत्र्यसैनिक कॉ. आप्पासाहेब कडू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रयत शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य सिताराम गारुडकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आप्पासाहेब हंडाळ यांचा परिचय करून दिला. तसेच शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनातून प्रेरणा घेत आपल्या भवितव्याची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन केले. संघर्षातून उभ्या राहिलेल्या व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करावे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, जनरल बॉडी सदस्य किरण कडू पाटील, प्रभाकर पलघडमल, भाऊसाहेब पलघडमल, संजय पलघडमल, योगेश पलघडमल, संतोष पलघडमल, आकाश पलघडमल, दीपक पलघडमल, योगेश शशिकांत पलघडमल, नामदेव पलघडमल, सतीश शिंदे, सुनील सात्रळकर, विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गारुडकर, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, ज्युनिअर कॉलेज प्रमुख विद्या गोडगे, सर्व शिक्षक-शिक्षिका, पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमा पठाण यांनी केले, तर आभार रामदास तांबे यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आस, स्पर्धा परीक्षेची जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा आत्मविश्वास निर्माण करणारा हा मार्गदर्शनपर कार्यक्रम ठरला.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







