उसाचे उत्पादन वाढवा, पाण्याची जबाबदारी माझी : ना. राधाकृष्ण विखे पाटील

सोनगाव ,प्रतिनिधी (शहाजी दिघे ) : सहकारी साखर कारखानदारीचे अर्थकारण भक्कम करण्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र आणि एकरी उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकरी उसाचे उत्पादन वाढवावे, पाण्याची जबाबदारी माझी, असा विश्वास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सिंचन प्रकल्पांना महायुती सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याच्या सर्वेक्षणालाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७७ व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
ना. विखे पाटील म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. कारखान्याचे अर्थकारण अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने इथेनॉल आणि बायो-सीएनजी प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. बाहेरील उसावर अवलंबून न राहता कार्यक्षेत्रातच ऊस उत्पादन वाढविण्यासाठी संचालकांनी शेतकऱ्यांच्या थेट भेटी घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील पाणी प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. साकळाई, कुकडी आणि डिंभे-माणिकडोह प्रकल्पांना निधी उपलब्ध झाला असून, प्रवरा व गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी भविष्यात १२ लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले. यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंचन प्रकल्पांना गती दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।






