
अहिल्यानगर (प्रतिनिधी):राविराज शिंदे
गावपातळीवरील महसूल प्रशासन अधिक जबाबदारीने आणि पारदर्शक पद्धतीने काम करावे, यासाठी दीपक पाचपुते (जिल्हाध्यक्ष – माहिती अधिकार नागरिक समूह) यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे स्पष्ट व ठोस मागणी केली आहे.
श्री. पाचपुते यांनी आपल्या निवेदनात सुचवले आहे की,
प्रत्येक तलाठ्याचा गावनिहाय आठवड्यातील एक दिवस निश्चित करून त्या दिवशी संबंधित तलाठ्यांनी तीन वेळा – सकाळी ९, दुपारी १ आणि सायंकाळी ५ वाजता – GPS सह सेल्फी काढून तहसीलदार यांना पाठवणे बंधनकारक करावे.
त्यामुळे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित आहेत याची खात्री होईल.
तसेच, संबंधित गावात – ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणी – तलाठीचे नाव, आठवड्यातील उपस्थितीचा दिवस व वेळ, तसेच मोबाईल क्रमांक याचा फलक लावणे बंधनकारक करावा, अशीही त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे.
प्रशासनाने हे धोरण अमलात आणल्यास नागरिकांचे गैरसोयीमुळे होणारे नुकसान टाळता येईल, तसेच महसूल यंत्रणेवरचा जनतेचा विश्वास दृढ होईल, असे श्री. पाचपुते यांनी सांगितले.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांनी दररोज उपस्थिती नोंद तपासावी व मासिक अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, तर अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही त्यांनी सूचना केली आहे.
