
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी (अशोक मुळे)
हरित व प्रदूषणमुक्त शहराच्या दिशेने बीड जिल्हा प्रशासनाने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेमुळे शहराचे सौंदर्य वाढणार असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः झाडाचे रोप लावून मोहिमेला शुभारंभ केला. त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डिव्हायडरवर तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या मोहिमेअंतर्गत हजारो झाडांची लागवड करण्यात येणार असून, त्यामुळे हिरवळ निर्माण होईल, प्रदूषण कमी होईल, उन्हाळ्यातील उष्णता नियंत्रित राहील, नागरिकांना शुद्ध हवा मिळेल आणि जैवविविधतेत वाढ होईल, असे प्रशासनाने सांगितले.
मनोगतात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, “वृक्षलागवड ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता सातत्याने राबविण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तर हरित बीडचे स्वप्न साकार होईल.”
या कार्यक्रमास राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे, नगरपालिका सहआयुक्त संभाजी वाघमारे, नगर परिषद मुख्याधिकारी शैलेश फडसे, जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती. स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पुढील काही महिन्यांत संपूर्ण शहरात ही वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. 🌳


