
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा
चंद्रपूर :- खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या प्रश्नासाठी अनेक वेळा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याच्या प्रश्नावर त्या आक्रमक झाल्या असून विज द्या अथवा 2018 पासून जमा केलेल्या सुरक्षा रकमेवर व्याज द्या अन्यथा महावितरण च्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar ह्या नागरीकांच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असून सध्या त्यांनी 2018 पासून जिल्ह्यातील 1590 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विज मिळवून देण्याकरीता सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सदर शेतकऱ्यांनी वीज जोडणी करीता सुरक्षा ठेव देखील जमा केलेली आहे. या विषयासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र लिहून शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे.
उशीर झाल्यास सामान्य नागरीकांकडून विज बिलावर व्याज घेणारे महावितरण 2018 पासून शेतकऱ्यांना विज जोडणी देण्यास असमर्थ ठरले आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शेतकऱ्यांना विज किंवा शेतकऱ्यांनी महावितरण कडे सुरक्षा ठेव स्वरुपात भरलेल्या पैशावर व्याज न दिल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार असल्याचे खासदार धानोरकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री काय भुमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.