?php echo do_shortcode('[t4b-ticker]'); ?
A2Z सभी खबर सभी जिले की

चंद्रपूर जिल्ह्यात कोळंबी पालन व्यवसायाला चालना देणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

IMG 20260627 164904 188
सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र :
चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोळंबी पालन व्यवसायाच्या विस्ताराला राज्य शासन प्राधान्य देत आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील तलावांमध्ये जम्बो प्रॉन्स जातीच्या कोळंबी बीजांचे संचयन करून झिंगे उत्पादन वाढविण्याच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळंबी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी टायगर प्रॉन्स जातीचे सुमारे तीन कोटी कोळंबी बीज विशेष बाब म्हणून शासनामार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, मत्स्यव्यवसाय आयुक्त तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री राणे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील कोळंबी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी सुमारे ३ कोटी कोळंबी बीज उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे निवेदन सादर केले आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपलब्ध जलसंपत्तीचा अधिक परिणामकारक वापर करून मत्स्य उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, राज्यातील मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि अंतर्गत जलाशयांमधील मत्स्य उत्पादन क्षमता वाढविणे हे विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध तलावांचा प्रभावी वापर करून कोळंबी पालनाला प्रोत्साहन दिल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आर्थिक बळकटी मिळेल.

सध्या विभागाकडे गोड्या पाण्यातील कोळंबी बीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र योजना नसली तरी नाविन्यपूर्ण योजनांतर्गत जिल्हा नियोजन समिती अथवा जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान योजनांमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या पर्यायांचा विचार करता येऊ शकतो.

राज्य शासन मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मत्स्य उत्पादन वाढ, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ उपलब्धता यांसोबतच कोळंबी पालनासारख्या उच्च मूल्याच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील हा उपक्रम यशस्वी झाल्यास विदर्भातील इतर जिल्ह्यांसाठीही तो आदर्श मॉडेल ठरू शकतो, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Back to top button
error: Content is protected !!