
प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव
अहमदनगर, दि. १९ ऑक्टोबर :
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. तब्बल १२३३ किलो ७५० ग्रॅम गांजा न्यायालयीन आदेशानुसार जप्त करून त्याचा नाश करण्यात आला. जिल्ह्यातील अंमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अमली पदार्थ नाश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अंकुश फडके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही विशेष मोहीम राबवली. अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जप्त केलेला गांजा सुरक्षित पोलीस ठाण्यात साठवण्यात आला होता. त्याचा पंचनामा करून, अधिकृत समितीच्या देखरेखीखाली गांजाचा नाश करण्यात आला.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बावडे, तसेच पोलीस अधिकारी व पंच साक्षीदार उपस्थित होते. ही मोहीम गांजा तस्करीविरोधात अहमदनगर पोलीस दलाची ठाम भूमिका दर्शवते.
या यशस्वी मोहिमेमुळे जिल्ह्यातील तरुणांचे अमली पदार्थांपासून रक्षण होण्यास मदत होणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी
सांगितले.
















